शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘शेर शिवराज‘ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची असून लेखन –दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे.
त्या काळी विजापूरच्या दरबारात ‘मै लाऊंगा शिवाजी को…! जिंदा या मुर्दा!’, अशी वल्गना करत अफझलखानाने शिवरायांना जिवंत वा मृत घेऊन येण्याचा विडा उचलला होता. निर्माते नितीन केणी, प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे आणि चिन्मय मांडलेकर यांच्या साथीनं लेखक, दिग्दर्शक, निर्माता दिग्पाल लांजेकर यांनी अफझलखान वधाचा चित्तथरारक अनुभव ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर आणण्याचा विडा उचलला आहे.शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज‘ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला? हे पहायला मिळणार आहे. प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटात घडणार आहे. यासोबतच त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण ‘शेर शिवराज’ मध्ये दिग्पालनं केलं आहे.
‘शेर शिवराज’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, सुश्रूत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाचे छायांकन रेशमी सरकार तर संकलन विनोद राजे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज यांचे आहे. सानिका गाडगीळ रंगभूषा तर पौर्णिमा ओक यांनी वेशभूषेची जबाबदारी साभांळली आहे. शुभंकर सोनाडकर यांनी व्हीएफएक्स तर निखील लांजेकर आणि हिमांशु आंबेकर एसएफएक्सची धुरा सांभाळली आहे. वैभव गलांडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक तर असोसिएट दिग्दर्शक सुश्रूत मंकणी आहेत. बब्बू खन्ना यांनी अॅक्शनची जबाबदारी साभांळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर यांचे आहे.छत्रपती शिवरायांनी आपल्या तेजस्वी पराक्रमाने हिंदवी स्वराज्याचा एक नवा इतिहास घडवला. आपल्या तळपत्या खड्गानं त्यांनी शत्रूला पाणी पाजलं. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला आणि हिंदवी स्वराज्याला एक नवी दिशा प्राप्त झाली. याच दैदिप्यमान इतिहासाचे सुवर्णपान २२ एप्रिलला चित्रपटगृहात पहायला मिळणार आहे.