
कोल्हापूर : ‘टकाटक’ चा पुढील भाग अॅडल्ट कॅामेडी ‘टकाटक २’ १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट केवळ मनोरंजन नसून, मनोरंजनातून एक विचार पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं कथा-पटकथा, दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी सांगितले.
गण्या, श-या आणि चंदू या तीन मित्रांच्या भोवती कथा गुंफण्यात आली आहे. थट्टा-मस्करी, धमाल, विनोद करता करता एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न ‘टकाटक २’च्या माध्यमातून करण्यात आला आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे या कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. गीत-संगीताच्या बाबतीतही हा चित्रपट रसिकांचं मनोरंजन करणार आहे. गीतकार जय अत्रे यांनी गीतलेखन केलं असून, संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतसाज चढवला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून, संकल्पनाही त्यांचीच आहे. संवादलेखानाचं काम किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी चोख बजावलं असून, पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. छायांकन हजरत शेख वली यांनी केले असून निलेश गुंडाळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.