
कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ”यामिनी” हे भव्य प्रदर्शन येत्या १६ सप्टेंबरपासून १८ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस भरवण्यात येणार असून हे प्रदर्शन हॉटेल पॅव्हेलियन येथे भरवले जाणार आहे. प्रदर्शनात ९३ हून अधिक विविध वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल्स असणार आहेत. तर या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता रोटेरियन व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते होणार असून आमदार बंटी उर्फ सतेज पाटील, सौ.मधुरिमा राजे, छत्रपती, नासिर बोरसदवाला आणि रोटेरियन अनिरुद्ध तगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा रोटेरियन कविता घाटगे, सचिव रोटरियन प्रीती मर्दा, खजानिस डॉ. गीता पिल्लाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाबद्दल अधिक माहिती देताना त्यापुढे म्हणाल्या, प्रदर्शनात जवळपास शंभर स्टॉल्स आहेत. यामध्ये फॅशन आणि लाईफस्टाइलशी निगडित वस्तू, महिला व लहान मुलांचे कपडे, चप्पल, ज्वेलरी, होम डेकोर, नर्सरी यांच्याबरोबर अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. इचलकरंजी, गोवा, दिल्ली, मुंबई, पुणे, बेळगाव, रत्नागिरी येथून स्टॉलधारक सहभागी होणार आहेत. या वस्तूंच्या विक्रीतून उभा राहणारा निधी हा पूर्णतः सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनात भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच प्रदर्शनास भेट देणाऱ्यासाठी लकी ड्रॉ असणार आहे. प्रसिध्द सिने कलाकार राज हंचनाळे आणि प्रतिक्षा शिवणकर या प्रदर्शनास भेट देणार आहेत.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गीजने अनेक सामाजिक कार्य केले आहे. यामध्ये नेर्ली येथील आठवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या ३२ मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या पाच वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी संस्थेने उचललेली आहे. प्राणी प्रदूषण रोखण्यासाठी
५००० स्टिकर्स विविध वाहनांवर लावून जनजागृती केली आहे. ३०० गावातील सरपंचांना एकत्रित करून त्यांचे प्रबोधन केले. जेणेकरून ते आपल्या गावात याबद्दल प्रबोधन करतील. ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाद्वारे ४०० झेंड्यांचे वाटप केले आहे. स्वयंम शाळेतील मुलांना दत्तक घेतले. रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच भविष्यात तरुणाईमध्ये वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी जनजागृती, शैक्षणिक शिबिरांचे आयोजन, अवयव दान करण्यासाठी जागरूकता निर्माण करणे, १००० मुलींना सर्वीकल कॅन्सर लस देणे, पौंगडावस्थेतील मुलामुलींचे समुपदेशन या प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहेत. असेही अध्यक्षा कविता घाटगे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रिती मंत्री, आरती पवार, विशाखा आपटे, शोभा तावडे, योगिनी कुलकर्णी, सुजाता लोहिया, अंजली मोहिते, मेघना शेळके, सुरेखा इंगळे, सविता पदे, आशा जैन, रेणुका सप्रे, यांच्यासह रोटेरियन उपस्थित होते.